Monday, August 12, 2013

बेफाम मन

मनातल्या प्रश्नांच्या किचकट गाठी सोडवण्यासाठी माणूस नात्यांची गाठ थोडीशी सैल करून या गर्दीपासून लांब जातो.
कुठेतरी जाऊन शांत बसतो स्वत:त हरवलेल्या स्वत:ला शोधण्यासाठी.
स्वत:वर रागवलेल्या स्वत:ची समजूत काढण्यासाठी.
स्वत:चं स्वत:च मन भरून ऐकण्यासाठी.

हे सगळं इतकं किचकट कसं झालं ? झालं की आपणच केलं ?
पण स्वत:हून जाणूनबुजून करायला इथं दु:खावर कुणाचं प्रेम जडलंय ?

आपण मानलेली 'आपली माणसंही' कधीकधी पाठलाग करणं लगेचंच सोडून देतात, जणू काही वाटच पहात असावीत कधी एकदाची गाठ सैल होतेय या संधीची..

पण हे विचार मात्र आपला पाठलाग करणं का सोडत नाहीत ?

हवी असलेली नाती, नकोशी झालेली नाती, आधी हवी असलेली अन आता नकोशी झालेली नाती,

पडलेले प्रश्न, मिळालेली उत्तरं, पटलेली उत्तरं या सगळ्यांनी घेराव करून आपल्याला जाब विचारावेत आणि आपल्याकडे एकाचेही स्पष्टीकरण नसावे असे का व्हावे ?

आपल्याला वाटणारं जगासाठी चुकीचं असावं आणि जगाचे निर्णय नेहमी आपल्या विरोधातच असावेत हा नियमच आहे का आयुष्याचा ?
स्वत:चं आयुष्य स्वत:लाच इतकं परकं का वाटावं ?

शांत बसलेल्या शरीरात मन मात्र धावत असतं... बेफाम
वाटा संपतच नाहीत. त्या पसरतच जातात... द्रौपदीच्या साडीसारख्या.

अजूनही उरलेली वाट नजरेला दिसत असली की, मन जास्त अस्वस्थ होतं.
बेफाम धावत्या मनानंच जास्त थकायला होतं
आणि हे थकणं...
हे थकणंहि फक्त ज्याचं त्यालाच जाणवतं... आणि ज्याचं त्यालाच थकवतं....

No comments:

Post a Comment