काहीतरी अडवेल तुला नक्कीच, आपलीच एखादी आठवण साधी
नाही अडवलं तर, ती आठवण 'आपली' कशी ?
मग ती असेल फक्त एकट्या माझीच.
पूर्ण नाही काहीच... माहितेय मला,
पण
'अपूर्ण' हे सुद्धा एक अस्तित्व असतं,
म्हणून सांगतो,
अपूर्ण समूळ अदृश्य बनून राहण्याआधी,
वळून बघ तू एकदा मागे... निघून जाण्याआधी
इतिहास वाचलास की कळेल,
किनारा लाटांना कधीच अडवू शकला नव्हता... ना येण्यापासून ना जाण्यापासून
किनारा फक्त भिजतो... अगदी तळापर्यंत.
लाट गेली की सुकतो... तप्त उन्हाने
पण तळ तसाच राहतो... ओला
लाट पुन्हा येते... अन पुन्हा जाते सुद्धा.
कधी प्रेयसी बनून शांतपणे
तर कधी त्सुनामी बनून रणरागिणी सारखी रौद्रपणे
पण निर्जीव किनारा असतो निशब्द निश्चल..
त्याला ना भूतकाळातून शिकता येतं
ना सुंदर भविष्याचं स्वप्न पाहता येतं
ना धड वर्तमानात जगता येतं...
कुणीतरी जाणार आहे हे माहित असूनही त्याच्या येण्याची वाट पहात शून्य शब्द होऊन तिथेच थांबून राहणं हे फक्त त्या निर्जीव किनाऱ्याकडून शिकायचं...........